गरीब-गरजू दोन लाख नागरिकांनी घेतला शिवभोजनाचा आस्वाद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/5-12.jpg)
मुंबई – गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. 11 फेब्रुवारी 2020 रोजी योजनेच्या अंमलबजावणीला 17 दिवस पुर्ण झाले. या 17 दिवसांच्या काळात राज्यात 2 लाख 33 हजार 738 नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असल्याचे दिसून आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या शिवभोजन योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रजासत्तादिनी योजना सुरु झाल्यानंतर पहिल्या आठ दिवसांच्या कालावधीतच म्हणजे 2 फेब्रुवारी 2020 पर्यंतच शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या 1 लाखांहून अधिक (1 लाख 5 हजार 887 ) झाली होती. आता 11 फेब्रुवारीपर्यंत त्यात आणखी एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांची वाढ झाली आहे.
शिवभोजन योजनेत जेवण देतांना स्वच्छता, टापटीप आणि जेवणाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी मुख्यमंत्री ठाकरे स्वत: या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहेत. शिवभोजन केंद्रातून नागरिकांना चांगले आणि सकस जेवण मिळावे यासाठी ते आग्रही आहेत. याच उद्देशाने त्यांनी काही दिवसांपूर्वी योजना सुरु झाल्यानंतर शिवभोजन केंद्रात जेवण घेत असलेल्या नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून त्यांनी थेट संवाद साधला होता.