खबरदारीचा उपाय म्हणून यंदाचा चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा रद्द
कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्येत भर पडत चालली आहे. कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील अनेक धार्मिक, सांस्कतिक कार्यक्रमांना मोठा फटका बसला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई शहरात आढळून आले आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक उत्सव मंडळ चिंचपोकळीचा चिंतामणीने यावर्षीचा आगमन सोहळा रद्द करण्याच ठरवलं आहे…. चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला प्रंचंड गर्दी पाहायला मिळते. मात्र यंदा कोरोनामुळे हे शक्य नाही…संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. महत्वाचे म्हणजे, मुंबईतील पोलिसांवर अतिरिक्त ताण पडू नये म्हणून चिंचपोकळीच्या चिंतामणीची गणेश मूर्ती मंडपातच घडविण्याचे ठरवले आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सध्या महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट वावरत असल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा होणार? याबाबत गणेशभक्तांमध्ये उत्सुकता आहे. तसेच सर्व छोट्या-मोठ्या गणेश मंडळांमध्येही गेल्या अनेक दिवसांपासून यावर विचारमंथन सुरू आहे. यातच कोरोनाचा वाढता धोका पाहता चिंचपोकळीचा चिंतामणीने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार आगमन सोहळा रद्द करण्यात आला आहे.
त्याचबरोबर पाटपूजन सोहळाही रद्द करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता पोलिस प्रशासनावर कसल्याही प्रकारचा अतिरिक्त ताण पडणार नाही, याची मंडळाकडून दक्षता घेण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश सीताराम नाईक यांनी दिली आहे. तसेच नागरिकांना गणेश मूर्तीचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे.मूर्तीच्या उंचीबाबत शासन जे निर्देश देईल, त्यानुसार मूर्ती बनविण्यात येईल. चिंतामणी’च्या मूर्तीकार रेश्मा विजय खातू यांनी मूर्ती जागेवर घडविण्याची ‘ तयारी दर्शविली आहे, अशी माहितीही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पावलावर पाऊल ठेवून इतर मोठी मंडळेही अशाच प्रकारचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
मुंबईत रविवारी 1 हजार 395 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 79 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 58 हजार 135 वर पोहचली आहे. यापैंकी 2 हजार 190 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 26,986 जणांना कोरोनावर मात केली आहे.