कार्यालये बंद ठेवण्याचे मुंबई महापालिकेकडून आवाहन
मुंबई – मुंबईसह उपनगर आणि परिसरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या व भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. समुद्रात दुपारी १२.४७ च्या सुमारास भरती येणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये तसेच समुद्रकिनारे आणि पाणी भरलेल्या ठिकाणांपासून लांब राहावे, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
दरम्यान, किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये ४ आणि ५ ऑगस्टला काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.