“कंगनाविरुद्धच्या शिवसेनेच्या आंदोलनाला परवानगी, मग ‘मनसे’ला नोटीस का ?”
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई लोकल सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ‘सविनय कायदेभंगा’चा इशारा दिला आहे.२१ सप्टेंबर म्हणजेच सोमवारी (२१ सप्टेंबर) मनसे मुंबईत रेल्वेने प्रवास करणार आहे. त्यावर, हे आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा रेल्वे पोलिसांनी मनसेला नोटीस बजावून दिला आहे. मात्र, मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून सध्या सर्वत्र एपेडिमिक ऍक्ट लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, मनसेने सोमवारी हे आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा रेल्वे पोलिसांकडून संदीप देशपांडे यांना नोटीस पाठवून देण्यात आला आहे. मात्र, तरीही मनसे आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
“आम्हाला नोटीस आली तरीही हे आंदोलन करणारच. मुंबईत जर शिवसेनेच्या आंदोलनाला परवानगी मिळते. तर मग मनसेच्या आंदोलनाला नोटीस का? मुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर द्यावे. आमचं आंदोलन हे सर्वसामान्यांसाठी आहे. मुंबईत गेले अनेक दिवस लोकल सेवा बंद आहे. नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे मनसे हे आंदोलन करणारच. कंगनाच्या विरोधात शिवसेनेने केलेल्या आंदोलनाला परवानगी मिळते मग मनसेच्या आंदोलनाला नोटीस कशी बजावली जाते?”, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.