औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/4-5.jpg)
मुंबई |महाईन्यूज|
औरंगाबाद विमानतळाचं नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला होता. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन यांसदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
औरंगाबाद विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत आहे. औरंगाबाद महानगरपालिकेने औरंगाबाद विमानतळाला ‘धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ’ असे नाव करण्याबाबत ठरावही संमत केला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने या प्रस्तावास मान्यता दिली असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या नागरी विमान मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटवरुन देण्यात आली आहे.
औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन! असे ट्विट सुभाष देसाई यांनी केले आहे. याशिवाय महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील तमाम जनतेला दिलेल्या शब्दांची पूर्तता करण्यास कायम वचनबद्ध राहील, असा उल्लेखही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले आहे तर कोल्हापूर विमानतळाचे नाव छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर असे करण्यात आले असून याच धर्तीवर राज्य सरकारने औरंगाबाद विमानतळाचे नामांतरण करण्याचा निर्णय घेतला आहे.