आम्ही सरकारबरोबर आहोत, यात कुठलंही राजकारण आणणार नाही : देवेंद्र फडणवीस
मुंबई | “आम्ही सरकारसोबत आहोत, यामध्ये कुठलंही राजकारण आणणार नाही,” असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर सांगितले. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
“मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायलयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकार सध्या तीन पर्यायाने विचार करत आहे. अध्यादेश काढणे, फेरविचार याचिका दाखल करणे आणि खंडपीठाकडे जाणे. पहिले दोन पर्याय शासनाला योग्य वाटत नाही. तिसरा पर्याय योग्य वाटतोय. आम्ही सरकारबरोबर आहोत, यात कुठलंही राजकारण आणणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“सरकार घटनापीठाकडे जाणार आहे तर त्याला पाठिंबा देऊ. सरकारने मराठा समाजाला आश्वस्त केलं पाहिजे. जागा वाढवल्या, तर मराठा विद्यार्थींना न्याय मिळेल. या जागांवरील विद्यार्थ्यांची फी सरकारने प्रतिपूर्ती करावी”, असंही फडणवीसांनी सांगितले.
“सोमवार, मंगळवारपर्यंत ड्राफ्ट तयार करुन तो मुख्य न्यायमूर्तींकडे पाठवायचा आहे. या कायद्याला स्थगिती देता येत नाही, मग त्याठिकाणी आपण कमी पडलो का ? असेही ते यावेळी म्हणाले तसेच पुन्हा घटनापीठाकडे सर्व तयारीनिशी जाऊ. मराठा आरक्षण कसं बहाल करता येईल, त्यासाठी प्रयत्न करु असं आम्ही सरकारला सांगितलं आहे”, असं फडणवीस म्हणाले.