अळूचं फदफदं हवं की मिरचीचा ठेचा? मनसे नेत्याचे ट्विट
मुंबई | महाईन्यूज
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सध्या मोठे बदल घडवण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. २३ जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मनसे पक्षाचा झेंडा आणि अजेंडा बदलण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. मनसे अधिकृत ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवत मनसेकडून तसे संकेतही देण्यात आलेले आहेत. दरम्यान, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे पक्षप्रवेशाचं निमंत्रण दिलेलं आहे.
अळूचं फदफदं हवं की मिरचीचा ठेचा? असा सवाल संदीप देशपांडे यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारलेला आहे. “मंत्रालयातील गोड गोड अळूचं फदफदं आवडतं की शेतावरची मिरची ठेचा आणि भाकरी निर्णय तुमचा… ।। मराठा तितुका मेळावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।’ असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्विटच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शिवसैनिकांना मनसेत प्रवेश करण्याचं आवाहन केल्याचं बोललं जात आहे.