अकरावीचे ऑनलाईन वर्ग नोव्हेंबरपासून सुरू होणार, शिक्षण विभागाची माहिती
मुंबई – मराठा आरक्षणाप्रकरणी अद्यापही कोणताही निर्णय जाहीर न झाल्याने अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया कधी पूर्ण होणार आणि वर्ग केव्हा सुरू होणार हा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांनाही सतावत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून येत्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून अकरावीचे ऑनलाईन वर्ग सुरू केले जाणार आहेत.
मराठा आरक्षणप्रकरणी सुनावणी आणखी ४ आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियाही रखडल्या आहेत. दरम्यान या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाला दिलासा मिळावा आणि विद्यार्थ्यांना हव्या त्या शाखेचा अभ्यास सुरु करता यावा याकरिता प्रवेशाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमांद्वारे शिक्षण देण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासाचा येत्या आठवड्यात सुरु करण्याचा विचार सुरु आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद( एससीईआरटी)चे संचालक दिनकर पाटील यांनी दिली.
या माध्यमातून विशेषतः विज्ञान, वाणिज्य, कला या शाखांमधील सर्वाधिक घेण्यात येणारे विषय किंवा बंधनकारक असलेल्या विषयांच्या तासिका ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच या ऑनलाईन तासिका कोणत्या व्यासपीठावर , कशा आणि किती वेळासाठी उपलब्ध होतील यासंदर्भातील अधिक माहिती लवकरच देण्यात येईल, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले.