मुंबईत सोमवारी आणि मंगळवारी ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद
मुंबई | मुंबईतील लोअर परळ भागात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी दुरुस्ती कामासाठी सोमवार, १४ मार्च आणि मंगळवार, १५ मार्च रोजी ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत दादर, परळ, वरळी, माहीम, माटुंगा, प्रभादेवी, इत्यादी भागात तब्बल ३० तास पाणीपुरवठा होणार नाही, तरी संबधित विभागातील पाणी जपून वापरावे तसेच या दोन दिवसांसाठी पाणी पुरेल इतका पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
मुंबईतील या सहा विभागातील प्रभादेवी परिसर, सेनापती बापट मार्ग, एल. जे. मार्ग, वीर सावरकर मार्ग,ग णपतराव कदम मार्ग, एस. एस. अमृतवार मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार, पूर्ण माहीम पश्चिम विभाग, माटुंगा पश्चिम विभाग, दादर पश्चिम विभाग, डिलाई रोड, बी. डी. डी. चाळ, लोअर परळ विभाग आणि पांडुरंग बुधकर मार्ग याठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच धोबी घाट आणि महालक्ष्मी या भागातही १५ मार्च रोजी पहाटे ४ ते सकाळी ७ या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, तरी इथल्या रहिवाशांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.