मुंबई, कोकणसह राज्यात पुढील ४-५ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, कोकणात अतिवृष्टीची शक्यता
मुंबई: राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला पाहायला मिळत आहे. मुंबई, कोकणसह राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. याचप्रकारे येत्या चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे येते ४ ते ५ दिवस राज्यातील काही भागांना अलर्ट जारी केला जाऊ शकतो.
यापैकी पहिले २ ते ३ मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, विदर्भात ही मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात मान्सूनचा जोरदार कमबॅक
राज्यात पावसाचा जोर वाढताच आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पाऊस बरसतोय. मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी ५६ फुटांपर्यंत वाढली आहे. तर, इतर नद्याही ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बऱ्याच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे याचा रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे.
मुंबईतही सोमवारपासून (४ जुलै) मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. रेल्वे रुळांवरही पाणी साचल्याने लोकलच्या तिन्ही मार्गांवरील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.