खासदार अमोल कोल्हेंचं अजित पवारांना आव्हान; म्हणाले..
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना थेट चॅलेंज दिलं आहे. अमोल कोल्हेंच्या विरोधात तगडा उमेदवार देणार अन् तो निवडून आणणार असं अजित पवार म्हणाले. यावरून, अमोल कोल्हे यांनी अजितदादांना आव्हान दिलं आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, मी सामान्य कुटुंबातील असून त्यांना (अजित पवार) काउंटर करणे मला योग्य वाटत नाही. माझ्या विजयात प्रत्येक कार्यकर्त्याचा वाटा होता. त्यांनी भूमिका का बदलली, मला माहित नाही. मी आहे त्याच ठिकाणी आहे. खासगीतील चर्चा सार्वजनिक करणं योग्य नाही. दादांचा एवढा दरारा आहे तर त्यांनी केंद्र सरकारला बोलावं आणि कांदा निर्यात बंदी उठवावी.
हेही वाचा – इंद्रायणी प्रदूषणाबाबत आढावा बैठक : मंत्री दीपक केसरकरांच्या बैठकीला स्थानिक आमदारांना डावलले!
तत्वांबरोबर राहणं योग्य आहे. मी माझ्या पक्षासोबत आहे. मी कुठे गेलो आहे? आमदारांनी कोण कोणत्या कारणांमुळे भूमिका बदलली, हे येणाऱ्या भविष्यात समजेल. माझा ना कारखाना आहे, ना कंपन्या आहेत, ना माझ्यावर चौकशी आहे. दादांनी काल एका चित्रपटाचं उल्लेख केला. त्या चित्रपटातील संवादाबाबत बोलायचे झाल्यास, शिवाजी महाराजांना दख्खनची सुभेदारी द्यावी असे दिल्लीपतीच्या मनात होते. दख्खनची सुभेदारी ही स्वराज्याच्या कैक पट होती, मात्र तेव्हा सुभेदारी स्वीकारली नाही आणि तत्वांशी महाराजांनी तडजोड केली नाही, असंही अमोल कोल्हे म्हणाले.