‘छत्रपती शिवजी महाराजांचे स्वराज्य हे हिंदू राष्ट्र’; मोहन भागवत यांचे विधान
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह महाराष्ट्रभर पाहायला मिळत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे.
मोहन भागवत म्हणाले की, भारतात लोकशाही असल्याने राजकीय मतभेद, सत्तेसाठी स्पर्धा, परस्परांवर टीका होणारच. मात्र, सत्ताप्राप्तीसाठी टीका करताना जनतेमध्ये विसंवाद निर्माण होणार नाही आणि देशाच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही, याचा विवेक राजकीय पक्षांनी बाळगावा.
हेही वाचा – मराठी जनांनी ‘ही’ शपथ घ्यावी; शिवराज्याभिषेक दिनी राज ठाकरेंचं आव्हान
जागतिक आर्थिक संकटात तसेच करोनावर मात करताना भारताने उत्तम कामगिरी करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. जी-२० परिषदेचे अध्यक्षपद आणि नव्या संसद भवनामुळे सर्वसामान्य गैरवान्वित झाले आहेत. या सुखावणाऱ्या बाबी असल्या तरी भाषा, पंथ, संप्रदाय आणि सवलतीच्या मुद्द्यांवरून देशात हिंसा करणे अयोग्य असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
भारतात राहणाऱ्यांचे पूर्वज एकच होते. ते बाहेरून आले ते परत गेले. आता येथे कोणीही बाहेरचा नाही. आपण सर्व एकच आहोत आणि भारत हीच आपली मातृभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज हीच संघाच्या हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे, असं मोहन भागवत म्हणाले.