‘आरक्षण दिलं नाही तर विधानसभेला..’; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा
![Manoj Jarange Patil said that he will show the same in the Lok Sabha as Inga has shown in the Legislative Assembly](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Manoj-Jarange-Patil-and-Devendra-Fadnavis-780x470.jpg)
मुंबई | लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला १७ मिळाल्या आहेत. तर विशाल पाटील सांगलीतून अपक्ष निवडणूक आले आहेत. महाराष्ट्रात भाजपाच्या २०१९ मध्ये २३ जागा होत्या, त्यावरुन ही संख्या २०२४ मध्ये ९ वर आली आहे. या सगळ्यात मराठा आंदोलनाचा फॅक्टर होता अशा चर्चा होत आहेत. यातच मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी कुठेही कुणालाही पाडा हे सांगितलं नाही. पण मराठ्यांची मतं महत्त्वाची असतात, लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांनी कुणालाही अंगावर घालू नये, लोकसभेला जसा इंगा दाखवला तसा विधानसभेलाही दाखवेन. आरक्षण दिलं नाही तर विधानसभेला राज्यातील २८८ जागांवर आम्ही निवडणूक लढवू.
हेही वाचा – सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचा डंका!
प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत, ते पडायला नको होते. तसंच पंकजा मुंडे यांच्या पराभवाची कारणं शोधली पाहिजेत. मी काही राजकारणी नाही, पण सरकारने आता तरी जागं व्हायला हवं. सरकार मराठ्यांना भीत नव्हतं, या निवडणुकीत मराठा समाज एकवटला आणि ताकद दाखवून दिली. आरक्षणाबाबत आता तरी निर्णय घेतला गेला पाहिजे नाहीतर विधानसभेला आम्ही इंगा दाखवून देऊ, असा इशारा जरांगेंनी दिला आहे.