Maharashtra Rain : कोकणासह राज्यातील १९ जिल्ह्यांना आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे. त्यातच आजही अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील एकूण १९ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक भागांत पाऊस पडत आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासह संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा – संभाजी भिडेंच्या ‘त्या’ विधानावर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींना राग अनावर; म्हणाले..
दरम्यान, सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी पूरस्थिती परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. दुसरीकडे मुंबईसह उपनगरात आज हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.