29 ऑगस्ट रोजी मुंबईत उपोषण करणार; मनोज जरांगेची मोठी घोषणा

बीड : आतापर्यंत संयमाने घेतले, पण सरकारने 100 टक्के मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आता मुंबईत 29 ऑगस्ट 2025 ला आमरण उपोषण होणार असे म्हणत मनोज जरांगेंनी उपोषणाची तारीख देखील जाहीर केली आहे. मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारने फसवणूक केल्याचे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली.
मनोज जरांगे म्हणाले, प्रथम सरकारचे कौतुक आहे. दोन वर्षे झाले तरीही आम्ही संयमाने घेत आहोत. मागील उपोषण सोडताना चार मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले होते. आज तीन महिने पूर्ण झाले कुठल्याही मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे याचा अध्यादेश काढावा. विद्यार्थ्यांनी नेत्यांचे ऐकून शिक्षणात जातिवाद आणू नका.
हेही वाचा – ‘संत तुकडोजी महाराज यांचे कार्य दिशादर्शक’; अण्णा बोदडे
आम्ही जातिवाद करत नाही. सरकारकडे मागणी आहे की सगळे गुन्हे सरसकट मागे घ्या, अशा मागण्या आहेत. यासाठी 29 ऑगस्टला थेट मुंबईत येत आहे. सरकारला जे करायचे ते करावे. मला फक्त 28 ला सोडायला पोरं येतील. 29 ला ते परत जातील. 28 ऑगस्टच्या आधी सगळ्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजेत. आमच्या संयमाचा अंत बघू नका, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.
तसेच, ‘सगे सोय-याच्या अधिसूचनेला दीड वर्ष पूर्ण झाले आहे. पुढील आंदोलनाची दिशा 1 ऑगस्ट रोजी सांगणार आहे. सरकारने आपली शंभर टक्के फसवणूक केली. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुमच्या पाठ झाल्या आहते. यावर सरकारची पीएच.डी झाली आहे. शिंदे समितीने काम केले. आमच्या नोंदी नाहीत म्हणले होते. तुम्ही त्या नोंदी शोधल्या त्यामुळे सरकारचे कौतुक केले. आमच्या कुणबी नोंदी सापडल्या. जो अधिकारी कुणबी प्रमाणपत्र देत नसेल त्याला तात्काळ निलंबित करून टाका, अशी मागणी जरांगेंनी केली आहे.