संभाजीनगरचा पाणी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही झोपणार नाही, सत्ताधाऱ्यांना झोपू देणार नाही: फडणवीस
![We will not sleep till the water problem of Sambhajinagar is solved, we will not allow the authorities to sleep: Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/We-will-not-sleep-till-the-water-problem-of-Sambhajinagar-is-solved.png)
औरंगाबाद|“आता मागे जायचं नाही. आम्ही तुम्हाला आश्वासन देतो, जोपर्यंत तुमच्या पाण्याची समस्या संपत नाही, तोपर्यंत भाजप झोपणार नाही आणि झोपू देणार नाही”, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट ठाकरे सरकारला आव्हान दिलं आहे. औरंगाबादेत आज फडणवीसांच्या नेतृत्त्वात जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हजारोंच्या संख्येनी लोकांनी यात सहभाग घेतला. यावेळी फडणवीसांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. तसेच, हे भ्रष्टाचाऱ्यांचं सरकार आहे, असंही ते म्हणाले.
प्रत्येक नेत्याला जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही – फडणवीस
“आज तुम्ही जो एल्गार केलाय त्याने संपूर्ण महाराष्ट्राला हलवून टाकलंय. आता मागे जायचं नाही, आम्ही तुम्हाला आश्वासन देतो, जोपर्यंत तुमच्या पाण्याची समस्या संपत नाही, तोपर्यंत भाजप झोपणार नाही आणि झोपू देणार नाही, एकएका नेत्याला जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा संघर्ष असाच पुढे चालू राहील, हा संघर्ष तुमच्या भरवश्यावर सुरू राहील, आताही सरकारची कुंभकर्णी झोप उघडली नाही, तर या सरकारला कोणीही वाचवू शकत नाही, ही लढाई आम्ही जिंकणार, पाणी आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही”, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.
संघर्ष आता तेव्हाच संपेल ज्यावेळी इथे पाणी पोहोचेल – देवेंद्र फडणवीस
“ज्यावेळी संभाजीनगरात पाण्यासाठी त्राहिमाम चाललंय, जुम्मे के जुम्मे पाणी येतंय थेंब थेंब पाण्यासाठी संभाजीनगरचा माणूस तरसला आहे. अशा परिस्थितीत भाजप शांत बसू शकत नाही, आम्ही संघर्ष छेडलाय. मी या सरकारला चेतावणी देतो, हा संघर्ष आता तेव्हाच संपेल ज्यावेळी या ठिकाणी पाणी पोहोचेल. तोपर्यंत आम्ही तुम्हाला रात्री स्वस्थ झोपू देणार नाही”, असंही ते म्हणाले.
‘नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा’, फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं
“मुख्यमंत्र्यांना जर सांगितलं की आमच्याकडे पाणी येत नाही. तर ते त्यावर काहीच करायला तयार नाही. त्यांनी सांगितलं, मी म्हणतो म्हणजे सत्य समजा, संभाजीनगर नाव कशाला पाहिजे, मी म्हणतो संभाजीनगर तर संभाजीनगर समजा, मी म्हणतो म्हणून बेफिकर समजा, दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्री देतील कारण ते म्हणतात ती काळ्या दगडावरची रेख”, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
पाण्यावरुन वादाची ठिणगी; औरंगाबादमधल्या पाणीटंचाईवरुन शिवसेनेला फडणवीसांनी सुनावले