पवारांच्या खोटं बोलण्याचा आम्हाला अभिमान, रोहित पवार असं का म्हणाले
![We are proud of Pawar's lies, why did Rohit Pawar say that](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/We-are-proud-of-Pawars-lies-why-did-Rohit-Pawar-say-that.jpg)
अहमदनगर | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर सध्या विरोधकांकडून विविध आरोप होत आहेत. पवार यांच्यावर खोटे बोलत असल्याचा आरोप नेहमीच होतो. आता पवार यांनीच राज्यात जातीयवाद पसरविला, असा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एका जुन्या घटनेला आणि पवारांच्या पुस्तकातील एका प्रकरणाला उजाळा दिला आहे. १९९३ मध्ये मुंबईतील बॉम्बस्फोट झाले तेव्हा पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. या घटनेची माहिती देताना १२ ऐवजी १३ ठिकाणी स्फोट झाल्याचे पवार यांनी खोटे सांगितले होते. ते का सांगितले आणि त्याचे पुढे काय झाले, याची माहिती रोहित पवार यांनी ट्विट केली आहे.
‘होय! शरद पवार खोटं बोलले आणि त्यांच्या या बोलण्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या त्या बोलण्यामुळं मुंबईत जातीय दंगल घडवण्याचे आयएसआयचे मनसुबे उधळले गेले आणि म्हणूनच राष्ट्रपती असताना खुद्द स्व. प्रणव मुखर्जी यांनीही पवार साहेबांना आणि मुंबईला सलाम केला होता. राज्यात दंगल भडकवण्याच्या आयएसआयच्या प्रयत्नांना उधळून लावत पवार यांनी तेंव्हा राज्यात शांतता प्रस्थापित केली होती. पण आज दंगल भडकवून त्या आगीत राजकीय पोळी भाजण्याचा तर कुणाचा प्रयत्न नाही ना?’, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
दुसऱ्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे, ‘१९९३ मधील मुंबई दंगलीची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती श्रीकृष्ण आयोगानेही पवार यांच्या खोटं बोलण्याची विशेष दखल घेत ‘धीस इज द एक्सापम्पल ऑफ स्टेटसमनशीप’ अशा शब्दांत वाखाणणी केली. पण आज आग विझवण्याऐवजी भडकवणाऱ्यांना त्याची काय किंमत कळणार?’
नेमकं काय आहे पुस्तकात…
शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथनपर पुस्तकातील एक प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. पवार मुख्यमंत्री असताना १९९३ मध्ये मुंबईत जे बॉम्ब स्फोट झाले, त्यावेळचा हा किस्सा आहे. त्यावेळी आपण खोटं बोललो होतो, अशी कबुलीच पवारांनी यामध्ये दिली आहे. अर्थात खोटं का बोलावं लागलं याचं स्पष्टीकरणही दिलं आहे
‘त्यावेळी कोणत्याही स्थितीत मुंबईत पुन्हा जातीय दंगली भडकणार नाहीत एवढी खबरदारी माझ्या दृष्टीनं अग्रक्रमाची होती. तातडीनं दूरदर्शनवरून आणि आकाशवाणीवरूनही जनतेला घटनेची माहिती दिली. त्यावेळी बॉम्बस्फोट १२ ठिकाणी झाले असूनही जाणीवपूर्वक १३ ठिकाणी झाल्याचं मी सांगितलं. सर्व बॉम्बस्फोट हिंदू बहूल भागात झालेले होते. परंतु कोणतीही जातीय अनुचित प्रतिक्रिया उमटू नये म्हणून मी मस्जिद बंदर या मुस्लिम भागातही स्फोट झाल्याचं सांगितलं.’ पुढे या प्रकरणी नेमलेल्या श्रीकृष्ण आयोगासमोर पवारांची साक्ष झाली. १२ ऐवजी १३ का जाहीर केलं? यासंबंधी आयोगानं प्रश्न विचारला. त्यावर पवारांनी उत्तर दिलं की, ‘माझं विधान असत्य होतं. पण पुढील संभाव्य हिंसा रोखण्यासाठी शहाणपणानं जाणीवपूर्वक घेतलेला तो निर्णय होता’, असं पवारांनी पुस्तकात लिहिलं आहे.
‘धीस इज द एक्सापम्पल ऑफ स्टेटसमनशीप’ अशा शब्दांत आयोगाच्या अहवालात पवार यांच्या या कृतीची दखल घेण्यात आली आहे.