मोठी बातमी! नागपुर शहराला तुर्तास भारनियमनाचा फटका नाही
![War weyn! Magaalada Nagpur ma aysan gaarin culeyska hadda socda](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/War-weyn.png)
नागपुर | कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम झाल्याने राज्यात भारनियमानाला सुरुवात झाली असली तरी नागपूर शहराला याचा फटका बसणार नसल्याची माहिती आहे. असे असले तरी शहरात गेल्या काही दिवसापासून ‘अघोषित’ भारनियमनाला सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले वरिष्ठ अधिकारी
उन्हाळ्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ होते. त्यात कोळशाच्या टंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम झाल्याने विजेचे नियोजन करताना महावितरणला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सुमारे २ हजार ५०० ते ३ हजार मेगावॉट विजेची तूट भरून काढायची आहे. परिणामी, शहरी व ग्रामीण भागातील वीजवाहिन्यांवर वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तात्पुरते भारनियमन करण्याचे संकेत आहेत. मात्र, असे असले तरी नागपूर शहराला भारनियमनाचा फटका बसणार नसल्याचं महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
अधिकाऱ्यांच्या मते उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विजेची मागणी २५ हजार ५०० मेगावॉटपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्यानंतरही अनेक भागात दररोज दहा मिनिटे ते दोन तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण होत आहेत. कुलर, एसी सुरू झाल्याने यामुळे रोहित्र ट्रिप होत असल्याचं कारण कंपनीकडून देण्यात येत असले तरी हे अघोषित भारनियमनच असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.