#War Against Corona: राज्यात इयत्ता १० वी भूगोल विषयाचा पेपर रद्द : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (व्हीडिओ)
मुंबई। महाईन्यूज । प्रतिनिधी
कोरोना आणि लॉकडाउनमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने होणाऱ्या इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या शिक्षण शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
इयत्ता दहावीचे भूगोल आणि कार्यशिक्षण हे दोन्ही पेपर रद्द करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षा महामंडळाच्या प्रचलित व विहित कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यांच्या गुणांबाबत कार्यवाही करण्यात येईल. त्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे नववी आणि अकरावीची परीक्षा देखील रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात टाळेबंदी लागू केली होती. या पार्श्वभूमीवर इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र राज्यातील परिस्थिती बघता ही टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत वाढविण्यात आली असल्याने नववी व अकरावीच्या दुस-या सत्रातील परीक्षा न घेता, पहिल्या सत्रामध्ये झालेल्या चाचण्या, प्रात्यक्षिके आणि अंतर्गत मुल्यमापण करून विद्यार्थ्यांची वर्गोन्नती करून त्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने शासनास सादर केला होता. यावर निर्णय घेऊन त्यासाठी आवश्यक त्या सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत असेही प्रा. गायकवाड यांनी सांगितले आहे.