VVPAT संबंधीची विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली !
मुंबई : व्हीव्हीपॅटमधील ५० टक्के चिठ्ठ्यांची ईव्हीएमसोबतच मोजणी व्हावी, अशी विरोधकांनी केलेली मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांच्या मोजणीत कोणताही बदल होणार नसल्याने विरोधकांना याचा जोरदार झटका बसला आहे. ईव्हीएम मशीनमध्ये कोणती गडबड झाली नसल्याची खात्री व्हावी म्हणून व्हीव्हीपॅटमधील ५० टक्के चिठ्ठ्यांची ईव्हीएमसोबतच मोजणी व्हावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती.
Election Commission rejects demands of opposition parties' regarding VVPAT. More details awaited pic.twitter.com/zyxETDjWOE
— ANI (@ANI) May 22, 2019
प्रमुख २२ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसंबंधी काही मागण्या केल्या होत्या. विरोधी पक्षांच्या या मागण्यांवर निवडणूक आयोगाने बुधवारी बैठक घेत मागणी फेटाळण्याचा निर्णय जाहिर केला. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास बाकी असतानाच निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याने विरोधाकांना मोठा झटका बसला आहे.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे मंगळवारी गेले होते. या नेत्यांनी निवडणूक आयुक्तांना सांगितले की, देशभरामध्ये ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यावर निवडणूक आयोगाने संमती दर्शवत या मुद्द्यावर विचार केला जाईल, असे आश्वासन दिले होते. अखेर विरोधकांची ही मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. १९ मे रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर देशभरातल्या अनेक भागात ईव्हीएमबरोबर छेडछाड झाल्याची बाब समोर आली होती आणि याबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला होता.