राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस; वादळी वाऱ्यासह गारपीटही कोसळली
![Unseasonal rains again in the state; The hail also fell along with the storm](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/RAIN-696x447.jpg)
मुंबई – राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. याचा फटका मराठवाड्याच्या काही भागाला बसला आहे. त्यामुळे या भागातील पिकांचं मोठं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मराठवाड्यासह विदर्भ आणि राज्यातील अन्य भागातही 18 ते 21 मार्चदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पावसासह गारपीट झाली आहे. तालुक्यातील हसनाबाद ,तळेगाव, सुरंगळी या भागात पहाटे 5 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झाली आहे. त्यामुळे या भागातील पिकांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जातोय. सुमारे अर्धा तास चाललेल्या पावसामळे जागोजागी गारांचा खच पडल्याचं दिसून आलंय.
वाशिम जिल्ह्यातही विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे या भागातील फळबागासह रब्बी पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ढगांच्या गडगडाटासह लातूर जिल्ह्यात अनेक भागात मध्यरात्री पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे या भागातील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.