बीडमध्ये मराठा मोर्चासाठी जय्यत तयारी, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली
![‘Maratha Morcha Nigharanach’, Vinayak Mete Aggressive; The first march will start in Beed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/maratha-arakshan-1.jpg)
- मराठा समाजाचे शिष्टमंडळ घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
बीड – सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर बीडमध्ये राज्यातील पहिला मराठा मोर्चा निघणार आहे. बीडमध्ये निघणाऱ्या या मराठा क्रांती मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मोर्चेकऱ्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बीड शहरात अनेक ठिकाणी भगव्या पताका लावण्यात आल्या आहेत. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल. मात्र, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे आता पुढे काय घडणार, हे पाहावे लागेल.
शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. एकीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी कोरोनाच्या काळात मोर्चे काढू नका, अशी भूमिका घेतली असताना विनायक मेटे मोर्चा काढण्यावर ठाम होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन मोर्चाला परवानगी मिळावी म्हणून निवेदन सादर केले होते. सदरचा मोर्चा मराठा क्रांती मोर्चांच्या प्रथेप्रमाणे शांततेत व शिस्तीत, कायदा व सुव्यवस्थेला कुठलीही बाधा येऊ न देता काढला जाईल. त्याचप्रमाणे कोरोना महामारीच्या काळातील आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करून, सोशल डिस्टनसिंग पाळून हा मोर्चा काढला जाईल याची खात्री असावी, असे या निवेदनात म्हटले होते. मात्र, त्यानंतरही पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी नाकरण्यात आली होती.
संभाजीराजे छत्रपती राज्यभरात मोर्चे काढण्याच्या विरोधात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोर्चे काढण्याला संभाजीराजे छत्रपती यांचा विरोध आहे. आंदोलन काय असतं, हे कोणीही मला शिकवू नये. आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात. आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण, शाहुंचा वंशज, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला होता.
मोर्चे काढण्याची गरजच काय?
जेव्हा एखादी गोष्ट राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवायची असते, तेव्हा मोर्चे काढले जातात. मराठा समाजाने 58 मोर्चे काढून आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवलं आहे. मराठा समाजाला काय हवंय, हे राज्यकर्त्यांना माहिती आहे. मग परत एकदा मोर्चे काढून लोकांना वेठीस का धरायचे, असा सवाल संभाजीराजे यांनी इतर मराठा नेत्यांना विचारला होता.
रस्त्यावर उतरून कोरोनामुळे लोक मेले तर काय करायचं? राज्य सरकारने दखल घेतली नाही तर आंदोलन करावेच लागेल. मात्र, सर्वप्रथम राज्यकर्ते मराठा समाजासाठी कोणत्या गोष्टी करायला तयार आहेत, हे त्यांनी सांगावे. श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण देऊ नका. पण 30 टक्के गरीब मराठा समाजाला मदत मिळालीच पाहिजे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.