सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील ‘या’ विद्यार्थ्यांना विद्यापीठात मोफत शिक्षण मिळणार
मुंबई : महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात उच्च शैक्षणिक फी माफिचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ भरणार आहे.
याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी केला होता. तसेच या निर्णयाला सर्व कुलगुरूंनी बहुमताने प्रतिसाद देत निर्णय मान्य केला आहे. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासन निर्णय काढत यापुढे तृतीयपंथी विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात फी माफ करण्याचा शासन निर्णय काढला आहे.
हेही वाचा – ‘प्रफुल्ल पटेलांचे दाऊद व त्याच्या हस्तकांशी संबंध’; ठाकरे गटाचे फडणवीसांना पत्र
दरम्यान, ५ डिसेंबर रोजी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंमलबजावणी संदर्भात बैठक झाली होती. यावेळी राज्यातील एनईपी २०२०च्या अंमलबजावणीची सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला होता. आगामी शैक्षणिक वर्षात एनईपीची सर्वांनी प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या होत्या. याचवेळी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी (शैक्षणिक शुल्क) विद्यापीठाने स्वनिधीतून भरावी. तसेच या विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण उपलब्ध होईल यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले होते.