पुणे-सातारा रस्त्यावरील टोल रद्द; नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
![Toll on Pune-Satara road canceled; Nitin Gadkari's big announcement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/IMG-20210925-WA0012.jpg)
पुणे – पुणे दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल एक मोठी घोषणा केली. आता पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्गावरील टोल रद्द करण्यात येणार असून या रस्त्याच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ५० कोटींचा निधी देण्यात येईल. तसेच या रस्त्यावर होणारे अपघात व आवश्यक उपाययोजनांचा एक खाजगी संस्था अभ्यास करत असून, लवकरच अहवाल सादर करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.
राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात तब्बल १३४ कोटी रुपयांची रस्ते, पुलांची कामे करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपाध्यक्षा डाॅ.निलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व आमदार व अधिकारी उपस्थित होते. यावेळी गडकरी पुढे म्हणाले की, पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणा-या दोन रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी एक म्हणजे पुणे- बंगळुरु महामार्ग.
“पुणे बंगळुरु हा नवीन ग्रीन हाय-व्हे एक्सीस कंट्रोल आम्ही बांधत आहोत. या रस्त्यावर नवीन पुणे विकसित करण्याचा विचार करा. यामुळे भविष्यात पुण्याचे कंजेशन कमी होईल”, असा सल्ला नितीन गडकरी यांनी अजित पवार यांना दिला. लवकरच, आम्ही या महामार्गाचे प्रेझेंटेशन महाराष्ट्र सरकारला देऊ आणि कामाला सुरुवात करू तसेच पुण्यासाठी हा महामार्ग महत्त्वाचा ठरेल असे देखील त्यांनी स्पष्ट केले. यामुळे पुणे- मुंबईची वाहतूक कोंडी कमी होईल “दक्षिणेतील म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ याचा उत्तरेतील म्हणजे पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, दिल्ली, हिमाचल, उत्तराखंड येथील सगळे ट्राफिक मुंबईहून पुण्याला येते. आम्ही ठरवलंय की हे सगळे ट्राफिक सुरतलाच थांबवू. त्यानंतर, सुरतपासून नाशिक, नाशिकहून अहमदनगर,अहमदनगरहून सोलापूर आणि सोलापूरहून अक्कलकोट, गुलबर्गा, यादगीर, कर्नुल आणि चेन्नई असा हा महामार्ग १२७० किलोमीटरचा असेल. ह्यावर आम्ही ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहोत यामुळे, मुंबई-पुण्याचं हे सगळं ट्राफिक कमी होईल असे गडकरी म्हणाले.