हिंगोलीतील तीन तालुके भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले
हिंगोली – हिंगोली शहरासह जिल्ह्यातील वसमत, औढा आणि कळमनुरी हे तीन तालुके काल रात्री लागोपाठ दोनवेळा झालेल्या भूकंपाच्या घटनेने हादरले. सुदैवाने यात कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. काल रविवारी रात्री ७.१४ आणि ८ वाजण्याच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले. पहिल्या भूकंपाची तीव्रता ३.४, तर दुसऱ्या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली.
जिल्ह्यातील या तीन तालुक्यात मागील काही वर्षांपासून भूगर्भातून गूढ आवाज येत असल्याचे नागरिक सांगत आहेत. मात्र या आवाजामागील नेमके कारण मात्र अद्याप प्रशासनाला समजलेले नाही. प्रामुख्याने शिंदे, पांघरा, वापटी, बोलडा, पिंपळदरी आणि सिंदगी आदी गावांतील नागरिकांना हे भूगर्भातील गूढ आवाज जाणवल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. प्रशासनाने या आवाजामागील गूढ शोधून काढावे अशी मागणी होत आहे.