ही भानगडच आता ठेवणार नाही’- राज ठाकरे
![This Bhangar will not be kept now' - Raj Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Raj-Thakre-1-700x470.png)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून ते रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील विविध गावांमधील पदाधिकाऱ्यांना भेट देत आहेत. तसेच पक्षबांधणीसाठी कार्यकर्त्यांना सुचना करत सज्जड इशारा देत आहेत. याच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी मला एकदा महाराष्ट्रातील सत्ता हातात द्या, मग महाराष्ट्र कसा करतो पहा, असं आवाहन कोकणवासियांना केलं आहे. यावेळी राज ठाकरेंनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत त्यांनी पक्षबांधणीबाबत सुचना केल्या आहेत. मुंबईत एका पक्षाचं काम करायचं, गावी आल्यावर वेगळ्या पक्षाचं काम करायचं, ही भानगडच आता ठेवणार नाही, अशा थेट इशाराचं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे. कोकणात खट्ट जरी झालं, तरी मला त्याचा धडाम आवाज मुंबईत येईलचं असाही राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना खडसावून सांगितले.
कोकणातच्या जनतेची देहबोली ही आशादायक आहे, कोकणातले प्रश्न अद्याप जैसे थेच आहेत. मला तन मन धन देऊन काम करणारी माणसं हवी आहेत, स्वत;हून पुढे या, असं आवाहनही राज ठाकरेंनी कोकणवासियांनी केलं आहे.
कोकणात असे अनेक पदाधिकारी आहेत. त्यांना काम करायचं आहे, पण त्यांना काही लोक काम करु देत नाहीत, या सगळ्यांना बाहेर काढणार, मला सगळे कोकणातील रिपोर्ट मिळतील, पुढच्या 15 दिवसात योग्य ते बदल करणार, असा सज्जड दमचं राज ठाकरेंनी भरला आहे.
येत्या काळात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा असा टाइट बांधतो की कुणी हात लावू शकणार नाही, बरं झालं मी कोकण दौऱ्यावर आलो म्हणून मला काही गोष्टी कळल्या, मुंबईत एका पक्षाचं काम करायचं, गावी आल्यावर वेगळ्या पक्षाचं काम करायचं, ही भानगडच आता मी ठेवणार नाही, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे.
महाराष्ट्रातील चार भारतरत्न एकट्या दापोलीतील आहेत, पण काही आहे का त्यांच महत्त्व? त्यांनी दिलेल्या विचारांटचा अभ्यास करा, आपल्या या तालुक्याचं महत्त्व इथल्या पदाधिकाऱ्याला माहिती पाहिजे, जुन्या लोकांना घरून कामासाठी बाहेर काढा, त्यांना काम करु द्या, असही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंन कोकण दौऱ्यादरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. राज ठाकरेंनी आता कोकणात मोर्चाबांधणी करत येत्या काळात कोकणात मनसेची वाटचाल कशी असेल याचे संकेत दिले आहेत. यावेळी त्यांनी पक्ष बांधणीत आड येणाऱ्या दुसऱ्या पक्षाला तुडवत पुढे असा स्पष्ट आदेशाचं कोकणातील कार्यकर्त्यांना दिला आहे.