एसटी कर्म कर्मचाऱ्यांना कायदेशीर कारवाईचा धाक दाखवल्याने ही वेळ आली
![The time has come for ST Karma employees to fear legal action](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/The-time-has-come-for-ST-Karma-employees-to-fear-legal-action.png)
अहमदनगर | एसटी कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात महाविकास आघाडीच्या सरकारला अपयश आल्यानेच हा उद्रेक आता रस्त्यावर आला आहे. आंदोलन करण्याचा हा मार्ग नाही. परंतू झालेल्या गोंधळाला सर्वस्वी महाविकास आघाडी सरकारचं जबाबदार आहे. सरकारने संवाद साधण्याऐवजी सतत कायदेशीर कारवाईचा धाक दाखवल्यानेच ही वेळ आली, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनासंबंधी प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले, एसटी कामगार पाच महीन्यांपासून आंदोलन करीत आहेत. १२५ कामगारांचे बळी गेले. तरीही सरकार शांत बसून होते. केवळ त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाचे कारण पुढे करुन सरकार वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत बसले. सरकारने कामगारांना विश्वासात घेवून त्यांच्याशी संवाद सुरू ठेवायला हवा होता. परंतू सरकार मधील प्रत्येक मंत्री फक्त कायदेशीर कारवाई करण्याचा धाक दाखवून कामगारांवर दडपशाही करीत असल्यामुळेच सरकारच्या विरोधातील रोष आता रस्त्यावर आला.
आंदोलनाची पद्धत चुकीची असल्याचं सांगताना ते म्हणाले की, कोणत्याही नेत्याच्या घरावर जावून असं आंदोलन करणं हा मार्ग नाही. परंतू सरकारनेच या कमगारांवर अशी वेळ आणली. नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात कामगारांच्या संपाबाबत चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात होती. मात्र, सरकारला चर्चा करायची नव्हती. केवळ बैठका चर्चा आणि तीन सदस्यांची समिती नेमण्याचा फार्स करून महाविकास आघाडी सरकारने कामगारांच्या तोंडाला पानं पुसली, असा आरोपही विखे पाटील यांनी यावेळी केला.