सावधान! राज्यातील तापमानाचा पारा ४० अंशांवर?
![The temperature in the state hovers around 40 degrees](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/High-Temperature-780x470.jpg)
राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान ४० अंशांवर गेले आहे. म्हणून दुपारी उन्हाच्या चटक्याने अंगाची लाही लाही होत आहे. दुसरीकडे, भर उन्हाळ्यात काही जिल्ह्यांत वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस व गारपीटदेखील होत आहे. त्यामुळे सध्या सतत बदलणाऱ्या हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
तसेच आज मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज (ता. १७ एप्रिल) मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय दक्षिण व मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
एकीकडे अवकाळी पावसाचे सावट असतानाच राज्याच्या कमाल तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिकांना विशेष काळजी घेणे गरजेचे झाले आहे. शक्यतो सकाळी १२ ते ५ वाजेपर्यंत घराबाहेर पडताना डोके हेल्मेटने किंवा टोपीने झाकावे आणि पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, म्हणजे उन्हापासून बचाव होईल.
पुढील दोन दिवसांत राज्याच्या तापमानात आणखी २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असली तरी गेल्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तर याशिवाय यवतमाळ, धुळे येथे ४९ अंशांवर पारा गेला होता. आता छत्रपती संभाजीनगरचा पारा ३९ अंशांवर असून त्यातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.