उन्हाचा तडाखा; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात शतकातील सर्वोच्च तापमान
नागपूर |
विदर्भात सुरू असलेल्या उष्णतेच्या झळा कायम आहेत. वाढत्या उष्णतेमुळे होणारी होरपळ शनिवारीही कायम होती. शनिवारी चंद्रपुरात एप्रिल महिन्यातील आजवरच्या सर्वाधिक, ४६.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. हवामान खात्याकडे उपलब्ध असलेल्या तपशीलानुसार, एप्रिल महिन्यात हे गेल्या १०० वर्षांतील सर्वोच्च तापमान आहे. यापूर्वी, २९ एप्रिल १९९६ रोजी चंद्रपूरमध्ये ४६.४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली होती. संपूर्ण विदर्भात सध्या कमाल तापमान ४२ ते ४६ अंशादरम्यान पोहोचले असून पुढील किमान दोन दिवस विदर्भवासीयांना या उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागणार आहे.
देशाच्या उत्तर, उत्तर-पश्चिम आणि मध्य भागातील सर्वच राज्यांमध्ये दोन दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. त्याचा परिणाम म्हणून अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. गेल्या आठवड्याभरापासून उन्हाने अक्षरश: लाहीलाही केली आहे. अकोला, चंद्रपूर, ब्रह्मपुरी ही शहरे जागतिक पातळीवर सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत स्थान पटकावित आहेत. शनिवारीदेखील चंद्रपूरने पहिल्या पंधरा उष्ण शहरांमध्ये ४६.६ अंशासह सहावा आणि ब्रह्मपुरीने ४६.३ अंशासह नववा क्रमांक पटकावला. उन्हाच्या चटक्यांमुळे सध्या विदर्भावासी कमालीचे हैराण असून, उष्माघाताचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शिवाय रस्त्यांवरील गर्दीही कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागासह स्थानिक प्रशासनानेही नागरिकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. यापूर्वी एवढ्या मोठ्या संख्येने विदर्भात उष्णतेची लाट आली नव्हती. ही वाढती संख्या लक्षात घेत विदर्भात उष्णता नियंत्रणात राखण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात, अशी मागणी आता होत आहे.
मे महिन्यात कमाल तापमानात वाढ
विदर्भात एप्रिल महिन्याच्या सरासरीपेक्षाही दोन ते चार अंशाने जास्त कमाल तापमान नोंदवले जात आहे. या मे महिन्यात महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होणार असली तरीही उष्णतेच्या लाटांची फारशी स्थिती नसल्याचा अंदाज भारतीय वेधशाळेने व्यक्त केला आहे.