महावितरणची थकबाकी हे भाजपचंच पाप आहे- नितीन राऊत
नागपूर – महावितरणची थकबाकी हे भाजपचेच पाप आहे. भाजपाची सत्ता असताना त्यांनी हेतुपुरस्सरपणे केलेल्या गैरव्यवस्थापनामुळे आज महावितरणवर थकबकीचा डोंगर उभा राहिला आहे, असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं आहे.
भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगावचे अधीक्षक अभियंता शेख यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाचा निषेध ऊर्जामंत्री राऊत यांनी केला. तसेच यावरून त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.
प्रचंड थकबाकी वाढवून महावितरणचे खासगीकरण करण्याची रणनीती भाजपने आखली होती. मात्र आम्ही ही थकबाकी वसूल करून खासगीकरणाचे हे संकट टाळण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे अस्वस्थ झालेले भाजपचे नेते ठिकठिकाणी महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत आहेत, अशी बोचरी टीका नितीन राऊतांनी केली आहे. तसेच प्रचंड थकबाकीमुळे महावितरण कंपनी संकटात सापडली असून ग्राहकांनी वीज भरून कंपनीला संकटातून बाहेर काढावं, असं आवाहनही राऊतांनी केलं आहे.
दरम्यान, भाजप नेत्यांनी कायदा हाती घेऊन अधिकारी-कर्मचारी यांना मारहाण करणे आणि त्यांच्या वीज बिल वसुलीच्या कामात अडथळे निर्माण करणं हे चुकीचं कृत्य असून असं करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं राऊतांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.