महाराष्ट्राच्या ‘महानंद’चा कारभार गुजरातमधून चालणार? नेमकं प्रकरण काय?
![The administration of Mahanand of Maharashtra will be run from Gujarat](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Mahanand-780x470.jpg)
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित, मुंबई म्हणजेच महानंदच्या संचालक मंडळाने महनंद राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाला (एनडीडीबीला) चालविण्यासाठी द्यावे, असा ठराव राज्य सरकारकडे पाठविला आहे. यावरून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
अनागोंदी कारभार, जिल्हा दूध संघांकडून केला जाणारा असहाकर, भ्रष्टाचार आणि राज्य सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे महानंदच्या दूध संकलनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. पिशवी बंद दूध वितरण ७० हजार लिटरवर आले आहे. प्रक्रिया प्रकल्पांना दूधच मिळत नसल्यामुळे प्रकल्प गंजून चालले आहेत. कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेत होत नाहीत. त्यामुळे महानंद एनडीडीबीला चालविण्यासाठी देण्याची मागणी पुढे आली होती.
हेही वाचा – रेल्वे विभागाचा मोठा निर्णय! प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे तयार करतेय ‘सुपर अॅप’
राज्य सरकारनेही त्यासाठी पुढाकार घेतला होता. कर्मचाऱ्यांचा वाढता रोष आणि वाढत्या तोट्यावर मार्ग म्हणून महानंदच्या संचालक मंडळाने २८ डिसेंबर रोजी महानंद एनडीडीबीला चालविण्यासाठी देण्याचा ठराव मंजूर करून संबंधित ठराव तत्काळ राज्य सरकारला पाठविण्यात यावा, असा निर्णय घेतला होता. त्यानुसार महानंदकडून ठराव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.