औरंगाबादेत गुंडांची दहशत; शहरामध्ये भीतीचं वातावरण
![Terror of goons in Aurangabad; An atmosphere of fear in the city](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Terror-of-goons-in-Aurangabad-An-atmosphere-of-fear-in-the-city.png)
औरंगाबाद | मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहराची ओळख आता ‘क्राईम कॅपिटल’ अशी होते की काय असा प्रश्न आता उपस्थितीत होऊ लागला आहे. अहिल्याबाई होळकर चौकात दोन गट भिडल्याच्या घटनेला एक दिवस उलटत नाही तो, पुन्हा एकदा शहरातील प्रियदर्शिनी उद्यानातील बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकाजवळ दोन गट आपसांत भिडल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे अशा घटना सतत घडत असल्याने सर्वसामान्य शहरवासीयांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
प्रियदर्शनी उद्यानाच्या रस्त्यावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोन गट आपसांत भिडले. सुरुवातीला दोन युवकांमध्ये वाद सुरू झाला होता. त्यातील एकाने समर्थकांना बोलावून घेतले. काही वेळात शेकडो युवक घटनास्थळी जमा झाले. रस्त्यावर दगड घेऊन एकमेकांना मारू लागले. दोन दुचाकींवरही दगडफेक करण्यात आली. एकाच बाजूचा जमाव अधिक असल्यामुळे दुचाकीवरील युवकाला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आली. यात एका युवकाच डोकं फुटलं आहे. त्यानंतर पोलीस घटनास्थळी येताच टोळक्याने पळ काढला.
शहरातील परिस्थिती गंभीर…
वाळूजमध्ये लोकांना अडवून टोळक्याने केलेली मारहाण, त्याच वाळूज भागात कंपनीत जाणाऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला करून लुटले, कॅनेट परिसरात तरुणाला टोळक्याची मारहाण, चिस्तिया कॉलनी येथे अवैध बांधकामावरून दोन गट भिडले, दोन दिवसांपूर्वी कोकणवाडी चौकात दोन गट भिडले, त्यानंतर काल पुन्हा प्रियदर्शनी उद्यानात टोळक्याने केलेला राडा आणि विशेष म्हणजे प्रियदर्शिनी उद्यानातील हाणामारीची घटना घडल्यानंतर काही वेळातच याच परिसरातील अन्नपूर्णा हॉटेलमध्ये मोबाईलवर बोलण्यावरून एका टोळक्याने पोलीस अधिकाऱ्याच्या पुत्रास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. पण याप्रकरणी तरुणाने तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे औरंगाबाद शहरातील परिस्थिती गंभीर बनली असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.