‘नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करा’; मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई – कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी 15 दिवसांची संचारबंदी लागू केली आली आहे. त्यामुळे कोणालाही विनाकारण कुठेही फिरता येणार नाही. कितीही कडक नियम केले तरी काही नागरिक या न त्या कारणाने नियम मोडतातच. अशाच नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश थेट मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखवला होता, मात्र आत्ताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे. त्यामुळे ‘ब्रेक दि चेन’ मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावं. राज्यात कठोर निर्बंधाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिला आहे.
विवाह समारंभ हे कोरोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचं लक्षात आलं आहे, त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने पाहावं. जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत, किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
दरम्यान, कोरोना विषाणूचे म्युटेशन झालेले आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळले आहे. गेल्या वर्षीपेक्षा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, तरुण पिढी जास्त संसर्गित झाली आहे. ऑक्सिजनचा उचित व योग्य वापर तसेच रेमडीसीव्हीरसंदर्भात काळजीपूर्वक पाऊले उचलावी लागतील, असंही मुख्यमंत्री म्हणाले.