अतिक्रमण कारवाई थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करून मनपाला घेरवा करू : बाबा कांबळे
- टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीच्या वतीने महापालिकेवर आंदोलन
![encroachment, action, stop, otherwise intense, protest, encircle municipality, baba kamble,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/baba-kamble-780x470.jpg)
पिंपरी: टपरी, पथारी, हातगाडी धारकांच्या मागण्या सोडविण्याएवजी महापालिका प्रशासन कष्टकऱ्यांवर जुलमी कारवाई करत आहे. त्याला राज्यकर्ते अप्रत्यक्ष पाठिंबा देत देत आहेत. ही अन्यायकारक कारवाई महापालिकेने थांबवावी. अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत राज्यकर्त्यांना धडा शिकवू, व अधिक तीव्र आंदोलन करून महानगरपालिकेला घेरावा घालू असा इशारा टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला. तसेच सातत्याने होणाऱ्या कारवाईच्या विरोधात महापालिका प्रशासनाचा निषेध केला.
शहरातील टपरी, पथारी, हातगाडीधारकांवर महापालिका प्रशासन सातत्याने अतिक्रमण कारवाई करत विरोधात टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीच्या वतीने बाबा कांबळे यांच्या नेतृत्वात महापालिकेवर आंदोलन करण्यात आले. फळभाजी विक्रेता, कष्टकरी महिला व आशा कांबळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. पुतळ्यापासून महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत ही रॅली आयोजित करण्यात आली. त्यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करतांना बाबा कांबळे बोलत होते.
यावेळी टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रमेश शिंदे, सचिव प्रकाश यशवंते, घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे, मधुरा डांगे,मलिक शेख, ज्योती कांबळे, अरुण भोसले, अनिता डांगे, नारायण कुचलानी, विशाल साबळे, राजेश महिलामणी, कृष्णा शिंदे, पल्लवी दाखले, इसराइल बागवान, मनीषा गगने, कल्पना शिरसाठ, मंगेश मेहता, अजय वायदंडे, प्रकाश घोले, शिवाजी कुडूक आदी या वेळी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले की, संघटनेने संघर्ष करून लढा देत टपरी, पथारी, हातगाडीधारकांसाठी संरक्षण देणारा कायदा करून घेतला आहे. या कायद्यामध्ये अनेक गोष्टींची तरतूद आहे. कारवाई दरम्यान साहित्य उचलून घेऊन जाण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना नाही. त्याविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया आहे. मात्र अधिकाऱ्यांनी कारवाई करून साहित्य घेऊन गेल्यानंतर त्या विरोधात संघर्षाची तयारी ठेवणे गरजेचे आहे. आपण तिकडे पाठ फिरविल्यास न्याय मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात चुकीच्या कारवाई विरोधात संघर्षाची तयारी ठेवावी असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले. तसेच जे राज्यकर्ते आपला केवळ निवडणुकीला वापर करतात. त्यांना धडा शिकवू असा इशाराही कांबळे यांनी दिला.