तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून २५० कोटींचा निधी जाहीर
मुंबई – तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना दिलासा मिळण्याकरता राज्य सरकारने मोठं पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. या चक्रीवादळ ग्रस्तांसाठी २५० कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. याबद्दलचा शासन निर्णय उद्या जाहीर होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.निसर्ग चक्रीवादळावेळी काढण्यात आलेला शासन निर्णय याही वादळाच्या नुकसान भरपाईसाठी लागू करण्यात आला आहे. तसंच एनडीआरएफच्या निकषांपेक्षा १८० कोटी अधिकचे राज्य सरकारच्या तिजोरीतून कोकणवासीयांना देण्यात येणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. यासंदर्भात काल बैठक घेण्यात आली आणि उद्याच्या कॅबिनेट बैठकीनंतर यासंदर्भातला शासन निर्णय काढण्याचं आम्ही ठरवलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या नुकसान भरपाईबद्दल विरोधी पक्षाकडून सरकारवर जोरदार टीका केली जात होती. मुख्यमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली…किती वेळ? फक्त तीन तास…तीन तासाचा हा दौरा केला. दोन दिवसांत भरपाई देणार म्हणाले..दिली का? का नाही दिली अजून…भरपाईची ठोस रक्कम अजूनही का जाहीर केलेली नाही? असे अनेक सवाल नारायण राणेंनी या सरकारवर उपस्थित केले आहेत.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले होते, “या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या अहवालावरुन राज्य सरकारला काही द्यायचंच नाही असं दिसून येत आहे. त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये ह्या अहवालातली नुकसानाची आकडेवारी जाहीर केली आहे. याबद्दल बोलताना ते म्हणतात, “कोकण विभागीय आयुक्तांकडून तौते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा तपशील राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे.”