एसटी महामंडळात सरकारतर्फे लवकरच भरती प्रक्रिया
सरकारची मोठी घोषणा, हजारो जागा भरल्या जाणार

मुंबई : आपल्याला सरकारी नोकरी असावी असे प्रत्येक तरुणाला वाटते. त्यासाठी अनेक तरुण दिवसरात्र मेहनत करतात. यात काही तरुण, तरुणींना यश येते तर काहींना मात्र सातत्याने अपयशाचा समना करावा लागतो. दरम्यान, आता एसटी महामंडळात आपल्याला नोकरी लागावी, अशी इच्छा बाळगणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची खुशबखर समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळात सरकारतर्फे लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार असून यशस्वी उमेदवाराला सुरुवातीपासूनच तब्बल 30 हजार रुपये पगार मिळणार आहे. याबाबत परिववहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
हजारो जागा भरल्या जाणार
प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी महामंडळात कंत्राटी चालक आणि सहाय्यकांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती एकूण 17 हजार 450 पदांसाठी होणार आहे. ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी शासकीय स्तरावर कारवाईला सुरुवात झाली आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरु होणार आहे. म्हणजेच 2 ऑक्टोबरनंतर एसटी महामंडळात तब्बल 17 हजार 450 पदांची भरती होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळात नोकरीसाठी धडपणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
30 हजार रुपये असणार पगार
मिळालेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रियेत यशस्वी झालेल्या उमेदवारा सुरुवातीपासून 30 हजार रुपये इतकं किमान वेतन मिळणार आहे. म्हणजेच या भरती प्रक्रियेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना 30 हजार रुपयांपेक्षा अधिक पगार असेल. त्यामुळे तरुणांना ही भरती प्रक्रिया एक चांगली संधी असू शकते. त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे तरुणांनी तयार ठेवावीत तसेच इतरही आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी तरुणांनी तयारी करावी, असे आवाहन केले जात आहे.
दरम्यान, एसटी महामंडळात या पदांसाठी भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळालेली असली तरी या पदांसाठी पात्रता काय असेल? इतर अटी काय आहेत? याबाबत माहिती मिळालेली नाही. एसटी महामंडळ याबाबतची माहिती लवकरच देण्याची शक्यता आहे. तसेच या भरती प्रक्रियेची जाहीरातही लवकरच प्रसिद्ध केली जाणार असून यात शिक्षण तसेच इतर अटींची माहिती सविस्तर दिलेली असेल, असे सांगण्यात आले आहे.