सांगली, कोल्हापुरातील पूर ओसरला
![Sangli, Kolhapur floods receded](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/sangali-rain.jpg)
सांगली/कोल्हापूर |
गेला आठवडाभर पडणाऱ्या तुफान पावासामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरला पडलेला पुराचा वेढा काही प्रमाणात सैलावण्यास सोमवारी सुरुवात झाली. पावसाने घेतलेली विश्रांती आणि धरणातून घटलेल्या विसर्गामुळे या दोन्ही जिल्ह्य़ातून वाहणाऱ्या कृष्णा, वारणा, पंचगंगासह अन्य नद्यांच्या पाण्याच्या पातळीत आज काही प्रमाणात घट झाली. दरम्यान पुराचे पाणी ओसरू लागताच या दोन्ही जिल्ह्य़ाच्या पूरग्रस्त भागात स्वच्छता, आरोग्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यासाठी वैयक्तिक ते सार्वजनिक पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ात गेल्या आठवडय़ात पावसाने धुमाकूळ घातला होता. पश्चिम घाटासह या जिल्ह्य़ात झालेल्या अतिवष्टीमुळे कृष्णा, वारणा, पंचगंगेसह सर्वच नद्यांना महापूर आले होते. या पुराचे पाणी सांगली आणि कोल्हापूर शहरासह नदीकाठच्या अनेक गावांमध्ये शिरले होते. रविवारपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत काहीशी घट झाली आहे, तर धरणातील विसर्गही थांबलेला असल्याने आता या दोन्ही जिल्ह्य़ातील पूर ओसरू लागला आहे. दरम्यान, गेले तीन दिवस जीव टांगणीला लावणारा महापूर ओसरू लागल्यावर आता स्वच्छता आणि आरोग्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या पुराच्या पाण्याने या दोन्ही शहरात सर्वत्र घाण, चिखल पसरलेला आहे. अनेकांची घरे, दुकानांतही मोठय़ा प्रमाणात चिखल साठलेला आहे. हा चिखल काढत स्वच्छतेचे मोठे आव्हान सध्या नागरिकांपुढे उभे ठाकले आहे.