“२०११ चा विश्वचषक सत्य साई बाबांमुळे जिंकू शकलो”; सचिन तेंडुलकर

Sachin Tendulkar | दिवंगत आध्यात्मिक गुरु श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात भारताचा माजी क्रिकेटपटू आणि ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकरने सत्य साई बाबांशी जोडलेल्या आठवणी सांगितल्या. २०११ च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या विजेत्या संघात सचिन तेंडुलकरचाही समावेश होता. या विश्वचषकाच्या आठवणी सांगताना सचिन तेंडुलकर म्हणाला की, २०११ च्या विश्वचषकादरम्यान बाबांनी मला पुस्तक भेट दिले होते. या पुस्तकामुळे मला प्रेरणा मिळाली.
सचिन तेंडुलकरच्या भाषणाचा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेने एक्सवर पोस्ट केला आहे. ज्यात सचिन म्हणतो, मी अनेक वर्ल्ड कप खेळल्यानंतर २०११ चा वर्ल्ड कप माझा शेवटचा चषक असेल, याची मला खात्री होती. बंगळुरूमध्ये सराव करत असताना मला फोन आला की, श्री सत्य साई बाबांनी त्यांचे पुस्तक मला भेट म्हणून पाठवले आहे. यामुळे माझ्या चेहऱ्यावर आनंद उमटला.
हेही वाचा : नितीश कुमार दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री; शपथविधीला पंतप्रधानांची उपस्थिती
श्री सत्य साई बाबांच्या या कृतीमुळे माझ्यात आत्मविश्वास संचारला होता. मला कळून चुकले की, हा वर्ल्ड कप आमच्यासाठी विशेष होणार आहे. या पुस्तकामुळे माझ्यात वेगळाच आत्मविश्वास जागृत झाला होता. आतून एक उत्साह सळसळत होता. यानंतर हे पुस्तक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे बनले. २०११ च्या वर्ल्ड कप दरम्यान काय झाले हे सर्वांनाच माहीत आहे. मुंबईत श्रीलंकेविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात आम्ही चषक उचलला आणि यानंतर संबंध देशाने जल्लोष साजरा केला. माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील हा सुवर्ण क्षण होता. मला नाही वाटत माज्या कारकिर्दीत मी कधी असे चित्र पाहिले, जिथे सर्व भारतीय एकत्र आनंद व्यक्त करत होते. आमचे हितचिंतक आणि आमच्या गुरूंनी दिलेल्या आशीर्वादामुळेच हे शक्य होऊ शकले, असेही सचिनने सांगितले.




