तरुणाईच्या आत्महत्येसंदर्भात निवृत्त पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांचा महत्त्वाचा सल्ला; म्हणाले..
मुंबई : ‘सध्या देशात दर वर्षाला १ लाख ७० हजार लोकांचा मृत्यू होतो. मात्र यामागे ७० टक्के तरुणांना समावेश असून यामागे निराशा, मानसिक तणाव, पालकांचा दबाव अशी अनेक कारणे त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे तरुणांनी सतर्क रहावे’ असा सल्ला महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस अधिक्षक डी. शिवानंदन यांनी युवा परिवर्तन संस्थेच्या रौप्य महोत्सव समापन सोहळ्यात दिला. हा कार्यक्रम गुरुवारी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला.
‘सध्या युवकांमध्ये मानसिक तणाव, सोशल मिडीयाचा अतिवापर, पालकांकडून वाढत जाणाऱ्या अवास्तव अपेक्षा या गोष्टी निराशा आणि आत्महत्या यासाठी कारणीभूत ठरत आहे. हे सांगताना डी. शिवानंदन यांनी गेल्या दोन वर्षातील मुंबई, दिल्ली अशा मोठ्या शहरातील घडलेल्या घटनांचाही आढावा घेतला. यावर पालक, तसेच शिक्षकांनी मुलांना योग्य त्या गोष्टींना नाही म्हणणे, शाळा तसेच कॉलेजमध्ये जागरुकता निर्माण करणे या गोष्टी करणे गरजेचे असल्याचे’ डी शिवानंदन यांनी सांगितले. या कार्यक्रमास युवा परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री. किशोर आणि मृणालिनी खेर, संस्थेच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आर गोपालकृष्णन तसेच बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचे चेयरमन डॉ. जन्मजेय सिन्हा उपस्थित होते. ‘उद्योजकता आणि कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून देशात समृध्दी आणणे’ ही या वर्षाची थीम होती.
हेही वाचा – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ८ हजार ६७६ कोटींचा आर्थसंकल्प सादर
भारतातील बेरोजगारी ही खरी समस्या नसून माणसाला कामानुसार योग्य मानधन मिळत नाही ही आहे. येथे प्रत्येकजण काम करतो. पण तो पुरेसे पैसे कमवेलच असे नाही. प्रत्येक शेतकऱ्याला व्होकेशनल ट्रेनिंगची गरज आहे. असे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचे जन्मजेय सिन्हा यांनी सांगितले.
‘देशाच्या अर्थकारणात महिलांचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यांना त्यांच्या मेहनत आणि योग्यतेनुसार योग्य मानधन मिळाले पाहिजे. महिला देशाच्या जीडीपीमध्ये मोलाची भूमिका बजावतात.’ असे वक्तव्य टाटा सन्सचे माजी चेयरमन आणि संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आर गोपालकृष्णन यांनी केले. २५ वर्षापूर्वी एका चांगल्या धोरणाने सुरु केलेल्या कामाचे आज वटवृक्षात रुपांतर झालेले आहे हे सांगताना संस्थापक किशोर खेर यांनी या २५ वर्षात संस्थेत झालेल्या स्थित्यंतराबद्दल सांगितले. विश्वस्त मंडळाचे सदस्य सुमन श्रीवास्तव आणि एन श्रीनाथ, सत्व कन्सल्टिंगचे रथीश बालकृष्ण आणि हकदर्शक संस्थेच्या शिल्पी पाटणी यांनी ‘ग्रामीण भागातील उपजिवीकेच्या संधी आणि समस्या’ या विषयावर आपली मते मांडली. तेथील समस्या तसेच करायचे उपाय याबद्दलही त्यांनी सखोलपणे चर्चा केली. ग्रामीण भागात कंपनी चालवणे कठीण आहे. तेथे रोजगाराच्या संधी निर्माण करणे गरजेचे आहे. असे मतही तज्ञांनी व्यक्त केले. यावेळेस संस्थेसाठी मदत करणाऱ्या समर्थकांचाही सत्कार करण्यात आला.