राणा दाम्पत्यानं राजपेठ पुलावरील बसवलेला शिवरायांचा पुतळा हटवला,महापालिका आणि पोलिसांची कारवाई
अमरावती | प्रतिनिधी
राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभीमान पक्षाच्या वतीने येथील राजापेठ उड्डाणपुलावर बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यरात्री पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आला. त्यामुळे आता अमरावतीत नव्या राजकारणाला परत एकदा सुरवात होण्याची शक्यता आहे
गेल्या बुधवारी (ता.१२) हा पुतळा बसविण्यात आला होता. त्यासाठी परवानगी घेण्यात आली नसल्याने आधीपासूनच वाद निर्माण झाला होता. महापालिकेने हा पुतळा हटविण्याच्या संदर्भात हालचाली सुरू केल्याने आमदार रवी राणा यांनी महापालिकेत बैठक घेऊन महापालिकेच्या आमसभेत हा विषय ठेवून त्या पुतळ्याला अधिकृत मान्यता देण्यात यावी असे निर्देश प्रशासनाला दोन दिवसांपूर्वीच दिले होते. दरम्यान, दररोज सायंकाळी राजापेठ उड्डाणपुलावरील या पुतळ्याच्या ठिकाणी अभिषेक, पूजा करण्यात येत होती. विविध संघटनांचे पदाधिकारी सुद्धा तेथे येत होते. ही अमरावतीकरांची मागणी होती. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे बसविण्यात आल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला होता.
दरम्यान, मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास प्रचंड पोलिस बंदोबस्तात हा पुतळा त्या ठिकाणावरून हलविण्यात आला. शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी प्रत्येक चौकात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आमदार रवी राणा तसेच खासदार नवनीत राणा यांच्या निवासस्थानी सुद्धा पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. आम्हाला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.