#ProhibitoryOrder: ‘सार्वजनिक शांतता भंग करू नका’; ‘या’ जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू
![#ProhibitoryOrder: 'Do not disturb public peace'; A restraining order has been issued in this district](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/prohibitory-order.jpg)
रत्नागिरी | रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी सामाजिक व वैयक्तिक कारणांसाठी, मागण्यांसाठी विविध आंदोलने होत आहेत. येत्या १ मे २०२२ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलनात्मक कार्यक्रम होणार आहेत. याबरोबरच, ३ मे रोजी मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद सण आणि हिंदू धर्मियांची अक्षय्य तृतीया हे सण एकाच दिवशी साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर २९ एप्रिल ते १३ मे पर्यंत हे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडून २८ एप्रिल रोजी सायंकाळी उशिरा जारी करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे न काढल्यास मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्यात येईल असा इशारा राज्य शासनाला दिलेला आहे. त्यामुळे मशिदीवरील भोग्यांवरुन आगामी काळात वाद विवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच राज्यात विविध ठिकाणी तणाव निर्माण करणाऱ्या घटना घडत असून त्याचे पडसाद रत्नागिरी जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेत हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
सर्व परिस्थिती लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता जिल्हयात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१) (३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आलेत. रत्नागिरीच्या अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी २९ एप्रिल २०२ रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते १३ मे २०२२ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात हे आदेश जारी केले आहेत. या आदेशान्वये वरील कालावधीत पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.
हे नियम पाळा
> शारीरिक दुखापत करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदूका, सूरे, लाठया अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे.
> अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे.
> दगड किंवा इतर शस्त्रे हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे.
> सभ्यता अगर निती याविरुध्द किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे, अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.
> इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे.
> सार्वजनिक रितीनी घोषणा करणे, गाणी गाणे, वादय वाजविणे.
> पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.
> आवेशी भाषण, अंगविक्षेप विडंबनपर नकला करणे, सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा किंवा ज्यामुळे जिल्हयाची सुरक्षितता धोक्यात येईल असे कोणतेही वर्तन करण्यास मनाई असेल.
उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश हे पुढील बाबींकरिता लागू होणार नाहीत.
अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी. शासकीय सेवेत तैनात कर्मचारी. सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच यासाठी हे आदेश लागू असणार नाहीत.
यासाठी परवानगी आवश्यक
प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणताही मोर्चा, मिरवणूका तसेच सभा, निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.