ग्रामीण भागातील आठवडी बाजार, रोजचा पालेभाज्या बाजारात भाजीपाल्याचे दर घसरले
कवडीमोल दराने पालेभाज्यांची विक्री, ग्राहकांना दिलासा, तर शेतकरी चिंतेत
![Prices of rural, parts, weekly, markets, leafy vegetables, vegetables, fell,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/bhajipala-780x470.jpg)
मुंबई : मागील काही दिवसापासून अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. ग्राहकाला यामुळे दिलासा मिळाला आहे. त्याच्या रोजच्या खर्चात थोडी बचत झाली आहे. तर दुसरीकडे भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. टोमॅटो 5 तर वांगे 10 रुपये किलोने विकत असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकर्यांचा वाहतुकीचा ही खर्च निघत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक शेतकर्यांनी टोमॅटो आणि वांगे रस्त्यावर फेकून दिल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय इतर भाजीपाल्यांचे ही दर कमी झाल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला. बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने सद्यस्थितीला कमी दर असल्याचं सांगण्यात येत आहे.
कवडीमोल दराने पालेभाज्यांची विक्री
आठवडी बाजारात भाजीपाल्यांची आवक वाढली आहे. पोषक वातावरणामुळे यावेळी भाजीपाल्यांचे उत्पादन वाढले आहेत. परिणामी, मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर, नाशिक, पुणे मार्केट यार्ड येथील तरकारी विभागात पाळेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने किंमती उतरल्या आहेत. भाजीपाला नाशवंत असल्याने झटपट विक्री करण्याचा सपाटा सध्या सुरू आहे. त्यामुळे भाजीमंडईत दर कोसळले आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर ग्राहक राजाची सध्या मिजास आहे. त्यांना अनेक दिवसानंतर पालेभाज्यांची विविध रेसिपी चाखता येणार आहे. एरव्ही ग्राहकांच्या खिशाला भाजीपाला घेणे सुद्धा अवघड होऊन बसलं आहे. ग्रामीण भागातील बाजारात त्यामुळे सध्या ग्राहकांची भाऊगर्दी उसळली आहे.
हेही वाचा – ‘सांगली येथे ज्यूदो खेळाचे निपुणता केंद्र उभारणार’; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
रब्बीचे पीक बहरणार
गेल्या पंधरवड्यापासून गायब असलेली थंडी अचानक वाढल्यामुळे धुळे जिल्ह्यातल्या रब्बी पिकांना त्याचा फायदा होणार आहे. तापमानाचा पारा हा 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे कमी झालेल्या तापमानाचा फायदा गहू, हरभरा आणि अन्य पिकांच्या वाढीला होणार आहे. थंडीचा कडाका असाच कायम राहिला तर येणार उत्पन्नही चांगले राहील अशी आशा शेतकर्यांना आहे.
पालेभाज्यांना कवडीमोल भाव
कोथिंबीर -2 ते 8 रुपये
मेथी – 4 ते 7 रुपये
शेपू – 3 ते 7 रुपये
पुदिना – 3 रुपये
पालक 3 ते 7 रुपये
कांदापात 5 ते 10 रुपये
करडई – 3 ते 6 रुपये.
चवळई – 6 ते 10 रुपये