तात्काळ पंचनामे करून तातडीने भरपाई द्या – शिवाजीराव नाईक
शिराळा / प्रतिनिधी
विनायक गायकवाड
शिराळा एमआयडीसी, भटवाडी, करमाळे, पाचुंब्री, घागरेवाडी, शिरशी यासह ज्या ठिकाणी वादळी पावसात नुकसान झाले आहे त्या अपादग्रस्तांना शासनाने तातडीने भरपाई द्यावी. त्याकरिता स्थानिक महसूल कर्मचारी यांनी तात्काळ पंचनामे करून प्रस्ताव तयार करावेत. असे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी सांगितले.
शिराळा एमआयडीसी सह नुकसान झालेल्या ठिकाणी दिलेल्या भेटीवेळी ते बोलत होते. रणजितसिंह नाईक, सत्यजित नाईक, नगरसेवक बंडा डांगे, सरपंच विजय महाडीक, विष्णु पाटील प्रमुख उपस्थित होते.
माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले, काल झालेले वादळ व पाऊस अतिशय उग्र स्वरूपाचे होते. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे शिराळा एमआयडीसी मधील अनेक उद्योजकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. भटवाडी, करमाळे येथील नागरिकांच्या राहत्या घरावरील कौले, पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणचे पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत जेणेकरून या अपादग्रस्तांना लवकर मदत मिळेल.
महसूल विभाग तसेच वितरण कंपनीच्या इस्लामपूर, सांगली व कोल्हापूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनी द्वारे चर्चा करून इथल्या नुकसानीची तीव्रता लक्षात आणून दिली आहे. त्यानुसार त्यांनी पंचनामे होऊन लवकरच दुरुस्ती करून वीज उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले आहे. तहसीलदार, प्रांताधिकारी यांना देखील आपण वस्तुस्थिती कल्पना दिली आहे. नागरिकांनी खचून न जाता या संकटाला सामोरे जावे. शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील.
यावेळी पिनु पाटील, संभाजी यादव, संभाजी पाटील, शिवाजी पाटील, मारुती पाटील, जयसिंग पाटील आदी उपस्थित होते. बाबासो फडतरे, विश्वास फडतरे, कुमार फडतरे, सतिश चव्हाण, रणजित चव्हाण, युवराज चव्हाण, अनिल चव्हाण, सुनिल चव्हाण, भगवान चव्हाण, प्रकाश चव्हाण, विकास पाटिल, पोपट चव्हाण, संदिप दिंडे, शरद चव्हाण, संपत चव्हाण, सुभाष चव्हाण यांच्यासह एमआयडीसी मधील उद्योजक, महसूल विभाग, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.