पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे भारताबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले, काश्मीरमध्ये जे काही चालले आहे ते थांबलं पाहिजे
![Pakistan Prime Minister's big statement about India](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/pakistan-pm-shahbaz-sharif--780x470.jpg)
भारत पाकिस्तानला एकत्र आणण्यासाठी संयुक्त अरब अमिराती महत्वाची भूमिका बजावू शकतं
मुंबई : आर्थिक दुष्टचक्रात अडकलेल्या पाकिस्तानला जगातील अनेक देश मदत करण्यास पुढे हात करण्यास इच्छुक नाहीत, तर काही देशांनी यापूर्वीच मदत केली आहे. पाकिस्तान धान्य टंचाईसह महागाईचा सामना करत आहे. पाकिस्तानला कोणीही मदत करण्यास तयार नाही आहे. त्यामुळे पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचं भारताबद्दल केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे.
भारत आणि पाकिस्तान शेजारी देश असून, एकमेकांबरोबर राहायला हवं. दोन्ही देशांनी शांततेत राहायचं, प्रगती करायची की भांडून संसाधने आणि वेळ वाया घालवायचा ठरवायला हवं. भारताबरोबर तीन युद्ध झाल्याने गरिबी आणि बेरोजगारीला आता आम्ही सामोरे जात आहे. तसेच, यातून आम्ही धडा शिकलो आहोत. पण इथून पुढे आम्हाला शांततेत जगायचं असून, समस्या सोडवायच्या आहेत, असं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलं आहे.
पाकिस्तानला गरिबी संपवायची आहे. देशात आनंदाचे वातावरण तयार करायचं आहे. आमच्या लोकांना चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगार द्यायच्या आहेत. आमची संसाधने बॉंब आणि दारुगोळ्यावर खर्च करायची नाही. तसेच, काश्मीरमध्ये जे काही चालले आहे, ते थांबलं पाहिजे, हाच पंतप्रधान नरेंद्र मोदींना संदेश आहे, असं शरीफ म्हणाले.
पाकिस्तानजवळ इंजिनीअर्स, डॉक्टर्स आणि कामगार आहेत. याचा वापर आम्ही पाकिस्तानच्या समृद्धीसाठी करु इच्छित आहे. त्यामुळे दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित होत, प्रगती करेल. तसेच, भारत आणि पाकिस्तानला एकत्र आणण्यासाठी संयुक्त अरब अमिराती महत्वाची भूमिका बजावू शकतं, असंही पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले.