पहलगाम हल्ला ! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी वाहिली मृतांना श्रद्धांजली ; कुटुंबियांचा आक्रोश पाहून स्तब्ध

Amit Shah in Anantnag : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम याठिकाणी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे, या हल्ल्यामध्ये आतापर्यंत २७ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
या दुःखद घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मू आणि काश्मीरला भेट दिली. ते अनंतनाग याठिकाणी पोलिस नियंत्रण कक्षात पोहोचले, ज्याठिकाणी त्यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांचे सांत्वन देखील त्यांनी केले. दरम्यान , कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अमित शाह स्तब्ध झाल्याचे दिसून आले.
हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर अमित शाह अनंतनाग रुग्णालयात गेले. त्याठिकाणी त्यांनी जखमींना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, अमित शाह दिल्लीला परतताच, मंत्रिमंडळाच्या सुरक्षा व्यवहार समितीची (CCS) बैठक बोलावली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेनंतर राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आणि विविध संकेतांची तपासणी सुरू केली. त्याच वेळी, सैन्य आणि सुरक्षा संस्थांनी ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बैसरन खोऱ्यात शोध मोहीम तीव्र केली आहे.
हेही वाचा – ‘असा बंदोबस्त करा की हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांचा थरकाप उडेल’; राज ठाकरे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भयानक हल्ल्याची योजना लष्कर-ए-तैयबाच्या संलग्न टीआरएफचा कमांडर सैफुल्लाहने आखली होती. रावलकोटमधील आणखी दोन लष्कर कमांडरही यात सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा हल्ला करणारे एकूण ६ दहशतवादी होते.
हल्ल्यानंतर, पाकिस्तानने नेहमीप्रमाणे या प्रकरणापासून हात झटकले आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, या हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही. पण यावेळी भारतानेही कडक भूमिका घेतली आहे. सौदी अरेबियाहून परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी हवाई क्षेत्र वापरण्यास नकार दिला.
या घटनेच्या एक दिवसानंतरच, बारामुल्लामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. हल्ल्याच्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी ही कारवाई एक मोठे यश मानले जात आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीपासून जयपूरपर्यंत सर्व पोलिस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संवेदनशील भागात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि अभय कमांड सिस्टीमद्वारे प्रत्येक इंचावर लक्ष ठेवले जात आहे.