आमची कटुता राष्ट्रवादीशी नव्हे तर शिवसेनेशी; मोदी-पवार भेटीनंतर भाजप नेत्याचं सूचक वक्तव्य
![Our bitterness is not with NCP but with Shiv Sena; BJP leader's suggestive statement after Modi-Pawar meeting](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Our-bitterness-is-not-with-NCP-but-with-Shiv-Sena-BJP-leaders-suggestive-statement-after-Modi-Pawar-meeting.jpg)
नागपूर|केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा रेटा प्रचंड वाढल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याविषयी वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतानाच दिल्लीत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अचानक पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी आणि पवार यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीला काही मिनिटंही उलटत नाही तोच महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. भाजपची कटुता ही शिवसेनेशी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसशी नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. मुनगंटीवार यांचे हे वक्तव्य नव्या राजकीय समीकरणांची किंवा भूकंपाची नांदी तर नाही ना, याविषयी सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
नरेंद्र मोदी आणि शरद पवार या दोघांमध्ये महाराष्ट्राविषयी चर्चा झाली का, याविषयी आता काही सांगणे शक्य नाही. पण भाजपचे कटू संबंध हे शिवसेनेशी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसशी नाहीत. शिवसेना आणि भाजपची युती होती. परंतु, शिवसेनेने बेईमानी केल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये विजयी करण्यासाठी मेहनत घेतली आणि त्यांनी बेईमानी केली. या बेईमानीमुळे भाजप आणि शिवसेनेचे संबंध कटू झाले आहेत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूक लढवली नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपचे संबंध कटू असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. तसेच नवाब मलिक किंवा अनिल देशमुख म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस नव्हेत. ते राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांपैकी एक होते, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले.
सुधीर मुनगंटीवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना यासंदर्भात वक्तव्य केले. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की, कालच नितीन गडकरी हे शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला गेले होते. आज शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. याचे राजकीय अर्थ काढू नयेत. हा आपल्या राजकीय परंपरेचा एक भाग आहे. विचारसरणीमध्ये फरक असला तरी मनभेद असता कामा नये, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.