बैलगाडा शर्यतीतील गैरप्रकारांविरोधात संघटना खंबीर भूमिका घेणार : संदिप बोदगे
पुणे: सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवरील बंदी पूर्णत: उठवली आहे. तरीही हा पारंपरिक खेळ अविरतपणे सुरू रहावा. याकरिता अखिल भारतीय बैलगाडा संघटना शर्यतीचा कायदा आणि नियम व अटींच्या अंमलबजावणीबाबत खंबीर राहणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदिप बोदगे यांनी दिली आहे.
संदिप बोदगे म्हणाले की, बैलगाडा शर्यतीची राज्याला अनेक वर्षाची परंपरा आहे वार्षिक धार्मिक यात्रेच्या प्रसंगी अनेक वर्षापासून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते आणि हीच बाब आपण माननीय सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करून सादर केलेली आहे .आता सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिलेली आहे त्यामुळे त्या काटेकोर पद्धतीने होण्यासाठी व पुढील कालखंडात अविरतपणे टिकून राहण्यासाठी काही नियम करणे आवश्यक होते,म्हणून शासनाच्या पशूसंवर्धन आयुक्तालयाने तयार केलेल्या नवीन नियमावली चे आम्ही संघटनेकडून स्वागत करतो.
तसेच, तामिळनाडू मध्ये सुद्धा फक्त पोंगल सणाच्या निमित्ताने जानेवारी ते मार्च मध्ये जल्लिकट्ट चे आयोजन केले जाते तसेच शर्यती वर नियंत्रण रहावे म्हणून तामिळनाडू सरकारने 5 लाख रुपये डिपॉझिट ची नवीन तरतूद केलेली आहे. आजपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाचे बैलगाडा चालू करण्यासंदर्भात महत्वाचे योगदान राहिले आहे. तसेच, संघटनेने यापूर्वी शर्यती चालू करण्यासाठी 11 वर्ष लढा दिलेला आहे. आता शर्यती चालू झाल्या असल्या तरी पुढील काळात शासनाचा बैलगाडा शर्यतीचा कायदा व नियम अटी अंमलबजावणी संदर्भात तसेच शर्यतीतील गैरप्रकार विषयी संघटना खंबीर भूमिका घेणार आहे, असेही संदिप बोदगे यांनी म्हटले आहे.





