कितीही चिखलफेक करा, आरोप करा, टीका करा, शरद पवार सगळ्यांना पुरून उरतील
रायगड |मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल ठाण्यात उत्तर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लक्ष्य केलं. जातीयवादाच्या आरोपांपासून मुस्लिम मतांच्या लांगुलचालनापर्यंत त्यांनी पवारांवर तोफ डागली. तसंच पवार नास्तिक असल्याचं म्हणत त्याच दृष्टीकोनातून ते आपलं राजकारण करत असल्याचं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांच्या आरोपांना आज स्वत: शरद पवारांनी पत्रकार परिषदेतून उत्तरे दिली. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही राज ठाकरेंना उत्तर दिलंय. कितीही चिखलफेक करा, आरोप करा, टीका करा, शरद पवार सगळ्यांना पुरून उरतील, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला.
महागाई वाढली, श्रीलंकेच्या पावलांवर पाऊल टाकण्याचा प्रवास सुरु
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. भाजपच्या सत्ताकाळात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पेट्रोल १२० रुपयांवर गेले आहे. श्रीलंकेच्या पावलांवर पाऊल टाकण्याचा प्रवास सुरू झाला आहे. त्यावर कोणी बोलायला तयार नाही. इथे काय तर ईडी, धाडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या मुद्द्यांवर डिबेट घडवले जात आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
“शरद पवार सगळ्यांना पुरून उरतील”
“काल एका नेत्याने ठाण्यात सभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सर्वात जास्त टीका केली. राष्ट्रवादी हा सर्वांसाठी काम करणारा पक्ष आहे, अठरापगड जातींना सोबत घेऊन विकास करणारा पक्ष आहे, त्यामुळे राष्ट्रवादीवर हल्ला केला जात आहे. पण मला त्यांना सांगायचंय, कितीही टीका करा, आरोप करा, पवारसाहेब सर्वांना पुरून उरतील”, अशा इशारा जयंत पाटील यांनी दिला.
मूळ प्रश्नांना सोयीस्कर बगल दिली जात आहे
बेरोजगारीचे काय? महागाईचे काय? महिलांवरील अत्याचाराचे काय? या मूळ प्रश्नांना सोयीस्कर बगल दिली जात आहे. आपल्याला या विरोधात आवाज उठवण्यासाठी एक कार्यकर्त्यांची चांगली फळी निर्माण करायची आहे, असे जयंत पाटील म्हणाले. इथली व्यवस्था जीर्ण आणि कमकुवत झाली आहे. तिला बळकट करण्याचा विडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उचलायला हवा, असंही जयंत पाटील म्हणाले.