मुंबई-नागपूर प्रवास चार तासांमध्ये… Bullet Train प्रकल्प सर्वेक्षणाचं काम पूर्ण आता प्रतिक्षा अहवाल अन् मंजुरीची
![अवघ्या चार तासांमध्ये मुंबई ते नागपूर व्हाया बुलेट ट्रेन… पाहा हा प्रकल्प नक्की आहे तरी कसा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/BULLET.jpg)
मुंबई |
लवकर महाराष्ट्रातील जनतेला राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूरदरम्यानचा प्रवास अवघ्या चार तासांमध्ये करणं शक्य होणार आहे. राज्यातील ही दोन्ही महत्वाची शहरे हायस्पीड रेल्वे कनेक्टीव्हीटीच्या माध्यमातून जोडण्यासंदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डिलेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्परेशन लिमिटेडच्या माध्यमातून तयार केला जात आहे. या अहवालामध्ये मुंबई ते नागपूरदरम्यान ७६६ किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन प्रकल्प राबवण्यासंदर्भातील चाचणी सुरु आहे.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसंदर्भातील सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सूपूर्द केला जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासंदर्भातील हवाई सर्वेक्षण, समाजिक परिणामांसंदर्भातील सर्वेक्षण, नैसर्गिक गोष्टींवर होणाऱ्या परिणामासंदर्भातील सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. आता सविस्तर अहवाल बनवण्याचं काम सुरु असल्याची माहिती या प्रकल्पाशीसंबंधित अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमधून जाणार आहे. काही जिल्ह्यांमद्ये जमीन अधिग्रहण करावं लागणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दोन शहरांमधील प्रवास करण्यासाठी सध्या जेवढा वेळ लागतो तो अर्ध्याहून अधिक कमी करण्याचा विचार आहे. सध्या या दोन्ही शहरांमधील प्रवास रस्ते मार्गेने करण्यासाठी किमान १२ तास लागतात. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून हा प्रवास चार तासांमध्ये होऊ शकतो असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिल्यानंतर यासंदर्भातील पुढील प्रक्रिया राबवण्यात येईल, असंही अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला समांतर मार्गीकेवरुन बुलेट ट्रेनचा मार्ग काढता येईल का याची चाचपणीही सुरु असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या ७०० किमीच्या सहा पदरी महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच एएचएसआरसीएल आणि जपान रेल्वे ट्रॅक कन्सलटंट कंपनीदरम्यान एक मह्तवाचा करार झाला आहे. मुंबई अहमदाबादला जोडणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गावरील टी थ्री पॅकेजच्या एचआरसी ट्रॅकवर्कचं काम या कंपनीला देण्यात आलंय.