“महाविकास आघाडी संकटाला संधी मानून राजकारण करत नाही”
मुंबई – कोरोनाच्या महामारीत सुरू असलेल्या राजकारणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली आहे. सध्या सगळेच या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला साथ द्या. राजकारण करू नका, असं सांगतानाच संकट ही संधी मानून महाविकास आघाडी राजकारण करत नाही, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर चांगलीच टिका केली आहे. सध्या सगळेच संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी एकमेकांचे दोष काढणं बरोबर नाही. मुंबईसह राज्यात कोरोनावर नियंत्रण येत आहे. त्यामुळं राजकारण करण्याची गरज नाही. सर्वांनी एकत्रं येऊन काम करावं. तरच संकटाला तोंड देता येईल. या कोरोना काळात राजकारण करणं योग्य नाही. राजकारण करण्याची आपली परंपरा नाही आणि सध्याच्या वातावरणात राजकारण करणंही योग्य नाही, असंही राऊत म्हणाले.
यावेळी त्यांनी मोफत लसीकरणावरही भाष्य केलं. जनतेच्या हिताचा निर्णय सरकार घेईल. कोणत्याही राजकारणाशिवाय हा निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मजबुतीनं काम करत आहेत. विरोधकांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावं. रुग्णांचा जीव वाचवणं हे आपलं प्राधान्य आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, केंद्रानं मंजूर करून आणि निधी देऊनही राज्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले नाहीत, या विरोधकांच्या आरोपांचं त्यांनी खंडन केलं. महाराष्ट्रात ऑक्सिजनशिवाय कुणाचाही बळी गेला नाही. उत्तर प्रदेशात, दिल्लीत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लांटचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. अशाप्रकारचे घाणेरडे आरोप विरोधकांनी करू नये. मी यूपी, बिहार आणि दिल्लीची महाराष्ट्राशी तुलना करत नाही. पण या राज्यांमध्ये जाऊन पाहा, त्या तुलनते महाराष्ट्र निश्चितच चांगलं काम करत आहे, असंही ते म्हणाले.